बीडच्या गंगामसला या गावानं चक्क सामुदायिकरित्या आत्महत्येचा निर्णय घेतल्यानं खळबळ उडाली. दुष्काळाच्या भीषणतेमुळे या गावाने हा निर्णय घेतला आहे. पिण्याला पाणी नाही, जनावरांना पाणी नाही अशा भीषण परिस्थितीत मराठवाडा सापडला आहे. जगावं कसं, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
बीडच्या गंगामसला गावात गेल्या अनेक वर्षांपासून शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. गावच्या शिवारा जवळून गोदावरी वाहत असली, तरी पाण्याअभावी तिचं पात्र वाळंवटाप्रमाणेच बनलं आहे. त्यात ग्रामीण बँकेनं कर्जासाठी हात आखडता घेतल्यानं सामुदायिक आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या गावाची साडे सहा हजार इतकी लोकसंख्या आहे. महत्वाचं म्हणजे गेल्या स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेतच लोकांनी या सामुदायिक आत्महत्येचा ठराव केला होता.

