राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यातील अठरा हजार बस पैकी केवळ २३०० बस रस्त्यांवर धावत असून, उर्वरित बस गेल्या अडीच महिन्यांपासून एकाच जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे या बस अडगळीत पडल्यासारख्या झाल्या असून, त्यांची दुरवस्था होऊ लागली आहे. या बस तातडीने रस्त्यावर आल्या नाहीत, तर त्यांत अनेक यांत्रिक त्रुटी निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ज्यात एसटीची अडीचशे आगारे आहेत. या आगारांत सुमारे १८ हजार बसद्वारे प्रवासी सेवा दिली जाते. एसटी कर्मचारी गेल्या अडीच महिन्यांपासून संपावर आहेत. त्यामुळे एसटीची वाहतूक थांबली आहे. काही आगारातून अंशतः वाहतूक सुरू असल्याने १८ हजार पैकी २३०० बस धावत आहेत. उर्वरित १५ हजार ७०० बस आगारात उभ्या आहेत. गेल्या वर्षी लॉकडाउन काळातदेखील बहुतांश एसटी बस एकाच जागेवर उभ्या होत्या. बस न धावल्याने इंजिन आणि बॅटरीत बिघाडाची शक्यता संभवते. एकाच जागी बस उभ्या राहिल्याने त्यांच्या बॉडीचेदेखील नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यातील स्वारगेट आणि शिवाजीनगर एसटी आगारात बसची पाहणी केली. त्या वेळी बसभोवती कचरा साठल्याचे; तसेच असंख्य बसवर धुळीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले.
