‘एरोली-काटई’चा पहिला टप्पा वर्षाखेरीस

ऐरोली-काटई फ्री वेच्या मार्गातील महत्त्वाचा भाग असलेल्या ऐरोली-मुंब्रा भागातील बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शुक्रवारी कल्यणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी या कामाची पाहणी केली. १.८ किमी लांबीचा बोगदा पूर्ण झाला असून पाचशे मीटरचे काम शिल्लक आहे. सध्याचा ४५ मिनिटांचा प्रवास या मार्गामुळे दहा मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. वर्षाखेरीस या रस्त्याची एक मार्गिका पहिल्या टप्प्यात सुरू होऊ शकणार आहे. तसेच महापालिकेकडून या मार्गासाठीच्या भूसंपादनासंदर्भात मागणी करण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

एमएमआडीएच्या माध्यमातून ऐरोली-काटई फ्रीवे चे काम सुरू असून त्यामध्ये ऐरोली-मुंब्रा दरम्यान पारसिक डोंगराखालून भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. या बोगद्यामुळे या शहरांमधील १२ किमीचे अंतर वाचून वेळेची बचत होणार आहे. ऐरोली ते मुंब्रा ३.७ किमी पट्ट्यातील १.८ किमी बोगदा पूर्ण झाला असून पाचशे मीटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवलीच्या नागरिकांना या प्रकल्पामुळे चांगला फायदा होणार आहे. याप्रकल्पातील मुंब्रा ते काटई रस्त्यासाठी ठाणे महापालिकेकडून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यास डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प मार्गी लागेल, असे शिंदे यांनी सांगितले. ऐरोली उन्नत मार्गाची उभारणीची मुंबई फ्री वेच्या धर्तीवर केली जाणार आहे. अडथळेमुक्त आणि विनाशुल्क प्रवास हा या रस्त्याची ओळख असल्याने वाहन चालकांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *