प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. यंदादेखील या दिवसावर करोना निर्बंधांचे सावट आहे. खादीच्या तिरंगा विक्रीवर याचा परिणाम बघायला मिळत असला तरी हळूहळू खरेदीत वाढ होत आहे.
जिल्हा खादी ग्रामोद्योग केंद्राच्या माध्यमातून खादीचा तिरंगा ध्वज विक्री केला जात असतो. शाळा, महाविद्यालयांसह शासकीय कार्यक्रमांमध्ये खादीच ध्वज फडकविला जात असतो. त्यामुळे दरवर्षी खादी ग्रामोद्योग केंद्रांतून झेंडा खरेदीची लगबग बघायला मिळते. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून करोना महामारीचा नकारात्मक परिणाम ध्वज विक्रीवरदेखील झालेला आहे. परिस्थिती पूर्वपदावर येत असताना शाळा, महाविद्यालय सुरू झाले होते. त्यामुळे यावर्षी चांगला व्यवसाय होण्याचा अंदाज होता. मात्र राज्यात निर्बंध कठोर केल्याने शाळा, महाविद्यालय बंदचा निर्णय घेण्यात आला. त्याचा फटका ध्वज विक्रीवर झालेला आहे.
