जलसुरक्षित सक्षम लातूर बनविणार;लातूरला मृदा व जलसंधारणाची घेतली शपथ, पालकमंत्र्यांनी केला संकल्प

‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’च्या बोधचिन्हाचे या वेळी अनावरण करण्यात आले; तसेच उपस्थितांना मृदा व जलसंधारणाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत गायले गेले. पोलिस निरीक्षक मोहन ठोंबरे यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन करण्यात आले

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच लातूरला जलसुरक्षित आणि अधिक सक्षम बनविण्याचा संकल्प पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या; तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन केले.

शहीद जवानांचे कुटुंबीय, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा पाटील, लातूर महापालिकेच्या महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलिस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, महापालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील यादी जाहीर

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील ५४ हजार ३८८ शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली असून, त्यापैकी २२ हजार ९६३ शेतकऱ्यांसाठी १५९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही लवकरच हा निधी वर्ग करण्यात येईल,’ असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

१५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’

‘पाण्याचे संवर्धन आणि काटकसरीने वापर ही काळाची गरज आहे. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त या वर्षीपासून २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ पाळला जात आहे. त्यानिमित्त १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

पालकमंत्र्यांचे आवाहन

पाण्यासाठी समाजाने एकत्र येण्याचा हा एक संकल्प आहे. युवक, विद्यार्थी, महिला बचत गट, शेतकरी आणि सामाजिक संस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्त, उत्साहाने सहभाग घ्यावा,’ असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *