मोदी सरकार ज्या कामगार क्षेत्रात सुधारणा आणण्याच्या विचारात आहे, त्याविरोधात उद्या देशव्यापी बंदचं आयोजन करण्यात आलं आहे. या बंदमध्ये बँका, विमा, खासगी उद्योग, सेवा क्षेत्रातले कर्मचारी सहभागी होणार असल्यानं देशातल्या सर्वच आर्थिक, उद्योग क्षेत्राला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
कामगार क्षेत्रातल्या या सुधारणांना विविध क्षेत्रातल्या 11 संघटनांनी विरोध केला आहे. सरकार आणि कामगार संघटना यांच्यामध्ये तोडगा निघू न शकल्यानं अखेर उद्याचा बंद अटळ दिसत आहे.
राज्यातील अनेक कामगार संघटना, स्थानिक स्वराज्य संस्थांमधले कर्मचारी हेदेखील या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
भारतीय मजदूर संघानं या बंदमधून ऐनवेळी माघार घेतलेली असली, तरी त्याचा आंदोलनावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही असा दावा प्रमुख सहभागी संघटनांनी केला आहे.

