भारताचे श्रीलंकेसमोर ३८६ धावांचे लक्ष्य

भारताचे श्रीलंकेसमोर ३८६ धावांचे लक्ष्य

तिस-या कसोटीत भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी ३८६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रोहित शर्मा (५०) व आर. अश्विन (५८) यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताचा दुसरा डाव २७४ धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेतर्फे धम्मिका प्रसाद व प्रदीने प्रत्येकी ४ तर हेराने १ बळी टिपला.

कोलंबोत सुरु असलेल्या तिस-या व निर्णायक कसोटीचा चौथ्या दिवसाचा खेळ लवकर सुरु झाला. ३ बाद २१ धावांवरुन पुढे खेळताना विराट कोहली व रोहित शर्मा ही जोडी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. भारताच्या ६४ धावा झाल्या असताना विराट कोहली झेलबाद झाला. श्रीलंकेचा गोलंदाज नुवान प्रदीपने कोहलीचा अडथळा दूर केला. कोहली २१ धावांवर बाद झाला. यानंतर रोहित शर्माने स्टुअर्ट बिन्नीच्या साथीने भारताला शंभर धावांचा पल्ला गाठून दिला. रोहित शर्माने अर्धशतक ठोकल्यानंतर भारताच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र रोहित ५० धावांवर असताना धम्मिका प्रसादने त्याला बाद केले व भारताची अवस्था ५ बाद १३२ अशी झाली. त्यानंतर बिन्नी (४९),  नमन ओझा (३५), अमित मिश्रा (३९), उमेश यादव (४) आणि आर. अश्विन (५८) धावावर बाद झाले. इशांत शर्मा २ धावांवर नाबाद राहिला.

पहिल्या डावात भारताने ३१२ धावा केल्या असून श्रीलंकेचा पहिला डाव २०१ धावांवरच आटोपल्याने भारताला १११ धावांची आघाडी मिळाली होती. मात्र दुस-या डावात भारतीय फलंदाजी ढेपाळल्याने सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत – श्रीलंकेने १-१ अशी बरोबरी साधली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *