अपुऱ्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील खालावलेला जलसाठा लक्षात घेता पालिकेतर्फे मुंबईत उद्यापासून २० टक्के पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आज मध्यरात्रीपासून पाणी कपातीचा हा निर्णय अंमलात आणला जाणार आहे. निवासी, औद्योगिक, व्यापारी अशा सर्वच क्षेत्रांसाठी ही पाणी कपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांत पावसाने दडी मारल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये साधारण पुढील आठ महिने पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक राहिला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये आजघडीला ९,४२, ३७२ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. गेल्यावर्षी याच दिवशी तलावांमध्ये १३,२८, ९३० दशलक्ष लिटर इतके पाणी होते.
