अभिनेता आमीर खान याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जलयुक्त शिवार अभियानासाठी 11 लाखांचा चेक सुपूर्द केला आहे.
आमीर खानने सढळ हस्ते केलेल्या या मदतीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावरुन त्यांचे आभारही मानले आहेत.
भविष्यातील महाराष्ट्र टँकरमुक्त आणि दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीस सरकारने जलयु्क्त शिवार ही योजना अंमलात आणली आहे. जलयुक्त शिवार ही मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. अशावेळी आमीर खान सारख्या एका संवेदनशील अभिनेत्याने पुढे येऊन आर्थिक मदत करणं ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे.
जलयुक्त शिवार ही पाणलोट क्षेत्र विकास योजना आहे. जलयुक्त शिवारसाठी प्रत्येक तालुक्यातील काही टॅँकरग्रस्त गावांची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आलीय. टप्प्याटप्प्याने सर्व राज्यात ही योजना राबवली जाणार आहे. जलयुक्त शिवार हे अभियान फारच उपयुक्त आहे. मात्र, त्यासाठी तेवढ्याच प्रमाणात निधीची गरज आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस साजरा न करता त्याऐवजी या अभियानासाठी पैसे देण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी आणि त्यांच्या सहकारी आमदारांनीही प्रतिसाद देत आर्थिक साह्य केलं होतं.

