औरंगाबादेत एक आगळावेगळा विवाहसोहळा पार पडला. या विवाहासाठी वऱ्हाडी मंडळी आली होती थेट जपानहून… आणि विवाहसोहळा पार पडला तो औरंगाबादमधील वृद्धाश्रमात.
हातभर मेहंदी, दळकुंडाचं कंगण, गळाभर सोनं यांनी नटललेली ही नवरी जपानची आहे. असुका असं तिचं नाव. भारतीय बौद्ध पद्धतीने चैतन्य भंडारे आणि असुका यांचा विवाह पार पडला. दोन भिन्न देशातील भिन्न संस्कृतींचा अनोखा मिलाफ झाला.
विवाहसोहळ्याकरता उपस्थित वऱ्हाडीमंडळीही फुलं टाकण्यासाठी तेवढेच उत्सुक होते. कारण ही मंडळी दुसरी तिसरणी कुणी नसून वृद्धाश्रमातले आजी-आजोबा होते. त्यामुळे हे लग्न काही अगळंवेगळं होतं, यात शंका नाही.
चैतन्य भंडारे हा मूळचा भारतीय. तो जपानच्या क्यूटो विद्यापीठात प्राध्यापक आहे आणि असुका ही डॉक्टर आहे. चैतन्य आणि असुकाच्या गाठी-भेटी झाल्या आणि मन जुळली. मग काय… त्यांनी लाईफ पार्टनर होण्याचं ठरवलं.
कौतुकास्पद बाब म्हणजे, या विवाहसोहळ्यात भेटवस्तूऐवजी रोख रुपात पैसे देण्याचं आवाहन वधू-वराकडून केलं गेलं आणि व्यासपीठवर एक बॉक्स ठेवण्यात आला. ही रक्कम वृद्धाश्रमाला देण्यात आली.
प्रेमाला देशाच्या सीमान नसतात, असं म्हणतात ते खरंय. याचाच प्रत्यय औरंगाबादेत आला. या विवाहसोहळ्यामुळे दोन संस्कृतींचं मनोमिलन झालं आहे. डॉ. आंबेडकरांनी जातीभेदाच्या भिंती दूर करण्याचा संदेश दिला आणि तो कृतीत उतरवला चैतन्य भंडारे आणि असुका यांनी.

