महिलांना घरापर्यंत रेल्वे जवानांची सोबत

कार्यालयीन कामाच्या वाढत्या व्यापामुळे रात्री उशिरा घरी परतणाऱ्या मुंबईतील महिलांना लवकरच रेल्वेच्या जवानांचा आधार मिळणार आहे. रात्री प्रवास करणाऱ्या महिलांना घरापर्यंत अथवा इतर सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी ‘कॉल करा, आरपीएफ बोलवा’ ही योजना राबवण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने घेतला आहे. या योजनेंतर्गत रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १८२वर दूरध्वनी करून महिलांना रात्री १२ ते पहाटे सकाळी ६ दरम्यान सुरक्षित प्रवासासाठी जवानांची मागणी करण्यात येईल.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिला कर्मचारी वर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत महिलांना लोकलने प्रवास करावा लागतो. त्यापैकी काही महिला प्रवासादरम्यान एकट्याच असतात. यामुळे संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने ही योजना आखली आहे. या योजनेंतर्गत रेल्वे स्थानकांवरील महिलांना एकट्याने प्रवास करण्यास असुरक्षित वाटल्यास त्यांनी रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १८२वर संपर्क साधावा. हेल्पलाइनवर संपर्क साधलेल्या महिला प्रवाशांच्या मदतीसाठी तातडीने आरपीएफ जवान किंवा महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी पाठवण्यात येतील. महिलांच्या मागणीनुसार सुरक्षित स्थळी पोहोचेपर्यंत हे जवान त्यांच्या सोबत असतील, असे रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

रेल्वे यार्ड आणि परिसरात महिलांवर होणारे हल्ले, चोरीच्या वाढत्या घटना आणि गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून १० अतिसंवेदनशील स्थळी सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण यार्ड, ठाकुर्ली यार्ड, कुर्ला यार्ड आणि अन्य अतिसंवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येतील. या सीसीटीव्हीचे निरीक्षण रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.

२६ जानेवारीपासून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील महिलांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी ही योजना राबवण्यात येईल. या योजनेनुसार रात्री १२ ते पहाटे सकाळी ६ या वेळेत प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आरपीएफ जवानांची नियुक्ती करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी १८२ क्रमांकाच्या हेल्पलाइनवर महिला प्रवाशांनी संपर्क साधावा. – के. के. अशरफ, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *