कत्तलखान्या’तील घोकंपट्टी

कत्तलखान्या’तील घोकंपट्टी

इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेतल्याने आपल्या पाल्याचे भवितव्य घडते, ही पालकांची अंधश्रद्धा आहे. उलट पालक आपल्या पाल्याचे भविष्य बिघडवत असून, कॉन्व्हेण्ट शाळांच्या ‘कत्तलखान्या’तील घोकंपट्टीमुळे ते आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहेत. याला सर्वस्वी पालक जबाबदार आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना कॉन्व्हेण्ट शाळेत घालणाऱ्या पालकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने कठोर कायदा करावा, असे मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईत व्यक्त केले.

मुंबई विद्यापीठाच्या राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्राने कलिना संकुलातील फिरोजशहा मेहता सभागृहात ‘समकालीन साहित्य आणि समाज’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते.

 ‘देशात एक हजार ६५७ भाषा आहेत, मात्र, यापैकी एकाही भाषेची जननी ही संस्कृत भाषा नाही. उलट भारतीय भाषांमधून संस्कृत भाषेचा जन्म झाला. मात्र, संस्कृत भाषेला भारतीय भाषांची जननी असल्याचे काही प्रस्थापित भाषांमधून ​बिंबवले जात असले, तरी संस्कृत भाषा ही कधीही भारतीय मूळ भाषांची जननी नव्हती,’ असे ठाम वक्तव्य डॉ. नेमाडे यांनी यावेळी केले. मराठी भाषेच्या साहित्याचा उगम हा इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात झाला. त्या काळात जैन मराठी व्याकरणकारांनी मराठी भाषा पुढे आणली. परंतु, त्यांचा इतिहास हिंदूंकडून पुसला गेल्यानेच मराठीचा उगम बाराव्या शतकात झाल्याचे सांगण्यात येते. ही बाब इतिहासाला धरून नसल्याचेही नेमाडेंनी यावेळी स्पष्ट केले. साहित्याचे समाजीकरण आणि विस्तारीकण होणे ही काळाची गरज असून, समकालीन साहित्य आणि समाज या दोन्ही परस्पर पूरक बाबी असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *