महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेन यासंबंधी अंदाज वर्तवला आहे. कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ढगाळ वातावरणदेखील राहील. तसंच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तसंच स्थानिक वातावरण यामुळे ढगाळ वातावरण राहील असं कुलाबा वेधशाळेने म्हटलं आहे.
राज्याच्या बहुतांश भागात गेल्या आठवडय़ात किमान तापमान कमी झाले होते. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला होता. गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये वातावरणात झपाटय़ाने बदल झाले आहेत. तापमानात मोठय़ा प्रमाणावर चढ-उतार होत आहेत. उत्तरेकडील अनेक राज्यांत सध्या थंडीची लाट आहे. या भागातून राज्याकडे थंड वाऱ्यांचे प्रवाह वाहत असले, तरी पावसाळी स्थितीमुळे त्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे.
राज्यात बहुतांश ठिकाणी सध्या अंशत: ढगाळ वातावरण आहे. परिणामी तापमानात वाढ होऊन थंडीत घट झाली आहे. मुंबई, रत्नागिरी, अलिबाग आदी ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांनी वाढले आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदी ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ४ ते ७ अंशांनी वाढ झाली आहे. महाबळेश्वरमध्येही पारा सरासरीच्या पुढे गेला आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद येथे किमान तापमान सरासरीपेक्षा ७ अंशांनी अधिक आहे. विदर्भात केवळ चंद्रपूर येथे सरासरीपेक्षा कमी १०.८ अंश तापमान आहे. हे रविवारचे राज्यातील सर्वात कमी तापमान ठरले होते.
