ग्रामीण भागातील दुग्धजन्य पदार्थ आणि अन्य कृषी उत्पादने मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘मुंबई मेट्रो’ हे मोठे आणि प्रभावी माध्यम आहे. यामुळे निश्चितच ग्रामीण भागातील उत्पादनांना मुंबईमध्ये हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्टेशन स्थानकावर वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या दुग्धजन्य पदार्थ विक्री स्टॉलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दुग्धविकास मंत्री अतुल सावे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (सावकर), मुंबई महापालिका आयुक्त तथा मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे,तसेच वारणा सहकारी दूध उत्पादक संघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मुंबई मेट्रो-3 ही शहराची नवी जीवनवाहिनी आहे. आशियातील सर्वात लांब एकेरी भूमिगत मेट्रो आहे. ही मेट्रो केवळ वाहतुकीची सुविधा नसून आर्थिक विकासालाही चालना देणारे व्यासपीठही आहे. मेट्रो स्थानकांवर उभारण्यात आलेल्या व्यावसायिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील उत्पादने थेट शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी निर्माण झाली आहे.”
