वेळा अमावस्येचा सण आनंदात साजरा करून सायंकाळच्या सुमारास शेतातून घरी परतणार्या शेतकरी कुटूंबावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना बुधवार, २५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास कळंब तालुक्यातील वडगाव जहांगीर येथे घडली. कर्नाटकातील एका भरधाव ट्रकने बैलगाडीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने एका बैलासह दोन महिलांसह एका लहान मुलीचाही घटनास्थळीच मृत्यू झाला तर एका मुलाचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या शिवाय अन्य एकजण गंभीर जखमी असून त्यांना उस्मानाबाद येथील खासगी रूग्णालयात हलवण्यात आले आहे.
कळंब व उस्मानाबाद तालुक्याच्या सीमेवरील वडगाव जहांगीर येथील शेतकरी दत्तात्रय शेटे (वय 35) हे वेळा अमावस्येचा सण साजरा करून रात्री ७.३० वाजेच्या सुमारास कुटुंबासह घरी परतत होते. यावेळी बैलगाडीत त्यांच्यासह त्यांचा सात वर्षीय मुलगा युवराज शेटे, रेश्मा माळवदे (वय 40), फनुबाई पवार (वय 40) आणि रेश्मा माळवदे (वय 40) हे होते. दरम्यान बैलगाडी गावाजवळ आल्यानंतर औरंगाबादहून उस्मानाबादकडे भरधाव वेगात येणार्या कर्नाटकातील मालट्रकने बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे लोखंड व लाकडाच्या असलेल्या बैलगाडीचा अगदी चुराडा झाला. तर बैलगाडीतील रेश्मा माळवदे त्यांची मुलगी गुंजन माळवदे, फनुबाई पवार या तिघींचा व बैलगाडीस असलेल्या बैलाच घटनास्थळीच मृत्यू झाला.
याशिवाय, अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवराज शेटे याचा देखील उपचारादरम्यान रुग्णालायत मृत्यू झाला. तर दत्तात्रय शेटे यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रकचालकाने तेथून ट्रकचा वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पळून जाणाऱ्या ट्रकला येडशी येथील टोलनाक्याच्या पुढे अडवून ट्रकचालकास पकडण्यात आले आहे.
