केस खेचले…मारहाण केली…लालूंच्या सुनेने सांगितला सासरी होणारा छळ

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या घरातील वाद शमण्याची चिन्हं दिसत नाहीत. लालू यांची सून ऐश्वर्या हिने पती तेजप्रताप यादव, सासू राबडीदेवी आणि नंणद मीसा भारती यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. राबडी देवी यांनी आपल्या महिला सुरक्षा रक्षकांसह आपले केच खेचले आणि मारहाण करत घराबाहेर काढले असल्याचा आरोप ऐश्वर्याने केला आहे.

पोलीस अधिकारी आरती कुमारी जयस्वाल यांनी सांगितले की, पोलिसांकडे ऐश्वर्याने तक्रार दाखल केली आहे. राबडी देवी, तेजप्रताप यादव आणि मीसा भारती यांच्याविरोध दाखल एफआयआरनंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. लालूंची पीडित सून ऐश्वर्या हिने सांगितले की, माझ्या आई-वडिलांविरोधात पाटणातील एका कॉलेजमध्ये आक्षेपार्ह पोस्टर लावण्यात आले होते. त्याबाबत मी सासू राबडी देवी यांना विचारणा केली. त्यावर त्यांनी मला उत्तर न देताच सुरक्षा रक्षकांच्या मदतीने मारहाण केली. माझ्याकडून माझा मोबाइल फोनही त्यांनी हिसकावून घेतला. मोबाइलमध्ये माझ्यावर होत असलेल्या अत्याचाराचे पुरावे असल्याचा दावा तिने केला आहे.

बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि लालू यांचे दुसरे पुत्र तेजस्वी यादव यांना या घटनेबाबत सर्व काही माहिती आहे. मात्र, त्याबाबत ते एक चकार शब्दही काढत नसल्याचे ऐश्वर्या यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात भर पावसात मला घरातून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर मला घरात घेण्यात आले होते, असे ऐश्वर्या यांनी सांगितले.

 या घटनेनंतर तेजप्रताप यादव, माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्याकडून कोणतेही वक्तव्य करण्यात आले नाही. ऐश्वर्याचे वडील आणि तेजप्रतापचे सासरे चंद्रिका राय यांनी जावई तेजप्रताप हा वेडसर मुलगा असल्याचे सांगितले आहे. आम्ही राजकीय लढाई तर लढणारच पण राबडी देवी यांचे कारनामेही जगजाहीर करणार असल्याचे वक्तव्य केले. जी महिला घरात एका महिलेला सुरक्षा देऊ शकत नाही, ती दुसऱ्या महिलेला काय सुरक्षा देणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ऐश्वर्याची आई पूर्णिमा राय यांनी राबडी देवी व कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. आपल्या मुलीला घरात जेवण देण्यात येत नव्हते इतका छळ त्यांनी केला असल्याचे पूर्णिमा यांनी म्हटले.

दरम्यान, ऐश्वर्या-तेजप्रताप यांच्यातील वादाला जाणूनबुजून उकरण्यात येत असल्याचे विरोधी पक्षनेते आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी म्हटले. राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी हा वाद उकरून काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून त्यावर लवकर निर्णय येईल असेही तेजस्वी यादव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *