बाबासाहेब पुरंदरेंचा इतिहास वाचण्यापेक्षा आपल्या आजोबांनी म्हणजेच प्रबोधनकार ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महारांजाबाबत लिहिलेला इतिहास वाचा, असा खोचक सल्ला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरेंना देण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराला विरोध केला आहे.
त्यावरून ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात राज यांनी आव्हाडांवर टीकास्त्र सोडलं.
त्यानंतर आव्हाड यांनी राज यांच्या टीकेला उत्तर दिलं.
“काही महान व्यक्तींनी महाराष्ट्राचं पुरोगामित्व जपलं. त्यातील एक व्यक्तीमत्त्व म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. प्रबोधनकारांनी लिहिलेलं शिवचरित्र आणि पुरंदरेंनी लिहिलेलं शिवचरित्र हे एकदा राज ठाकरेंनी वेळात वेळ काढून नजरेखालून घालावं. त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगावं की आम्ही प्रबोधनकारांचा वारसा जपावा की पुरंदरेंचा. सध्या आम्ही प्रबोधनकारांचा वारसा जपतोय. त्यामुळे पुरंदरेंच्या इतिहासाचं महात्म गाऊन आपल्या आजोबांना बाजूला ठेवू नका” असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला अनेकांनी विरोध केला आहे. त्यापार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी अनेक ठिकाणी कार्यक्रमही घेतले आहेत.

