नावेदला जिवंत पकडणाऱ्या राकेशकुमार शर्मा आणि विक्रमजीत सिंह या दोघांना शौर्यपदक आणि नोकरी

नावेदला जिवंत पकडणाऱ्या राकेशकुमार शर्मा आणि विक्रमजीत सिंह  या दोघांना शौर्यपदक आणि नोकरी

पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद उर्फ नावेदला जीवाची बाजी लावून जिवंत पकडणाऱ्या राकेशकुमार शर्मा आणि विक्रमजीत सिंह या गावकऱ्यांची शौर्य पदकासाठी शिफारस करण्यात आली असून दोघांना पोलीस दलात नोकरीही देण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात ५ ऑगस्ट रोजी सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आले होते. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी कसाबनंतर नावेदच्या रुपाने प्रथमच एखादा दहशतवादी जिवंतपणे भारताच्या हाती लागू शकला होता. राकेशकुमार आणि विक्रमजीत या दोन गावकऱ्यांच्या धाडसामुळेच हे शक्य झाले. त्यामुळेच या गावकऱ्यांचा योग्य तो सन्मान व्हावा, अशी अपेक्षा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत केलेल्या निवेदनात व्यक्त केली होती. याबाबत त्यांनी राज्य सरकारला निर्देशही दिले होते. त्यानुसार आता जम्मू-काश्मीर पोलिसांनी या दोघाही धाडसी गावकऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे, अशी शिफारस सरकारकडे केली आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक के. राजेंद्र कुमार यांनी या दोन्ही गावकऱ्यांना पोलीस सेवेत सामावून घेण्याचेही आदेश काढले आहेत. राजेशकुमारची कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती करण्यात आली असून विक्रमजीतला अद्याप नियुक्ती पत्र देण्यात आलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *