गणपती बाप्पाला आज निरोप

आज अनंत चतुर्दशी… लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस. दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर जड अंतःकरणाने गणपती बाप्पाचे गुरुवारी विसर्जन होणार असून, विसर्जनासाठी मुंबईतील चौपाट्या, तलाव, कृत्रिम तलाव येथे मोठी गर्दी उसळणार आहे. विसर्जन सुरळीत व्हावे यासाठी पोलिस, महापालिका यांसह सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

मुंबईत १२९ ठिकाणी विसर्जन करण्यात येणार असून, पालिकेच्या वतीने ३२ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. ५० हजार पोलिसांसह एसआरपीएफ, फोर्स वन, क्यूआरटी, फोर्स वन, रॅपिड अॅक्शन फोर्स यांची अतिरिक्त कुमक भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात ठेवण्यात आली आहे. यावर्षी मुंबईतील धोकादायक पुलांचा मोठा अडथळा विसर्जन मिरवणुकांमध्ये आहे. या पुलांवरून सुरळीत मिरवणुका नेण्याचे आव्हान पोलिस, पालिका आणि गणेश मंडळापुढे आहे. वाहतूककोंडी होऊ नये, विसर्जन मिरवणुका आणि वाहनचालकांचीही गैरसोय होऊ नये यासाठी मुंबईतील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. बाप्पाला निरोप देताना खोल पाण्यात जाऊ नये, तसेच पोलिस, जीवरक्षक यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *