मुंबई, ठाणे, कोकण परिसरात हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केल्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी शाळा बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. बुधवारी पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे मुंबई आणि उपनगरांतील सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. परिणामी रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवरही याचे थेट परिणाम पाहायला मिळाले. आठ तासांहून अधिक काळासाठी ठप्प असणारी मध्य रेल्वेची सेवा अखेर पूर्वपदावर येताना दिसत आहे.
सखल भागांमध्ये साचलेलं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली ज्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांची रुळावरुन घसरलेली गाडी रुळावर येत आहे. गुरुवारी पहाटेपासून पावसाने काशीही उसंत घेतल्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येत आहे. पहाटे ३ वाजून १७ मिनिटांनी पहिली लोकल अंबरनाथच्या दिशेने रवाना करण्यात आली. सध्याच्या घडीला सीएसएमटी येथून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या वेळेत आहेत. पण, कल्याणकडून सीएसएमटीकडे येणाऱ्या रेल्वे मात्र काहीशा उशिराने येत आहेत. हळुहळू ही परिस्थितीही पूर्वपदावर येण्याची चिन्हं आहे.
