घरगुती वादातून महिलेची दोन मुलांसह आत्महत्या

ठाण्यात घरगुती वादातून एका महिलेने दोन मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सीता वाविवा असं या महिलेचं नाव असून पती आणि सासू-सासरे यांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले असल्याचे तिने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले असल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.

राजू वाविवा याच्याशी सात वर्षांपूर्वी सीता यांचा कच्छ, गुजरात येथे विवाह झाला होता. राजू हा गॅरेजचा मालक आहे. पती राजू आणि सासू-सासरे यांच्याकडून सीता हिचा मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याची माहिती सदर महिलेच्या भावाने केलेल्या तक्रारीत दिली आहे.

काही दिवसांपूर्वी सीता आपल्या सासरहून आपल्या माहेरी कावेसर भागात राहायला आली होती. पती आणि सासरच्या मंडळींनी त्यांच्या चार आणि पाच वर्षाच्या दोन्ही मुलांचा ताबा आपल्याला मिळावा यासाठी सीताकडे सतत तगादा लावला होता. रविवारी संध्याकाळी सीताचे आईबाबा कामानिमित्त बाहेर गेले होते. ही संधी साधून सीताने तिच्या दोन्ही मुलांना छताला बांधलेल्या फासावर लटकविले आणि त्यानंतर स्वत:ही फास लावून घेतला. बराच वेळ काहीही प्रतिसाद न मिळाला नाही. घराच्या दरवाजाला आतून कुलूप घातले होते. भावाला संशय आल्याने त्याने तात्काळ पोलिसांना बोलविले. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून त्यात सीताने पती आणि सासरच्या जाचाला कंटाळून आपण हे कृत्य करत असल्याचे नमूद केले आहे. तिच्या सासरच्या मंडळींची या प्रकरणी चौकशी सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून गुन्हा नोंदविण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *