अपघाताच्या बहाण्याने लुटला ट्रकभर कांदा

रस्ते अपघातानंतर वाद-विवाद होतात. कधीतरी प्रसंग हाणामारीपर्यंत पोहचतो. पण, अपघातानंतर थेट कांद्याने भरलेला ट्रकच लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, रविवारी रात्री चौघा संशयित आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत सविस्तर वृत्त असे, फिर्यादी सोमनाथ रयाजी चव्हाण (४८, रा. अभोणा, ता. कळवण) हे कांद्याने भरलेला ट्रक (एमएच ०४, सीजी ०८३५) घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास हा ट्रक द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊस भागात पोहचला. यावेळी एक स्कॉर्पिओ (एमएच १५, ईपी ७४५७) या ट्रकला धडकली. अपघाताचे निमित्त करीत स्कॉर्पिओतील चौघांनी ट्रकचालकास मारहाण केली. तसेच ‘आम्ही सांगतो तसे वाहन चालव, नाहीतर तुझा गेमच करतो’, असे म्हणून चाकू गळ्यावर ठेवला. यानंतर आरोपी व ट्रकसह तपोवनात पोहचले. तेथे एका अज्ञात ठिकाणी ट्रकचालक चव्हाण यांच्यासह क्लीनरला डांबून ठेवण्यात आले. ट्रकमधील सुमारे ११ टन कांदा संशयितांनी काढून घेतला. तत्पूर्वी ट्रकचालकाकडील ५० हजार रुपयांची रोकडही त्यांनी काढून घेतली होती. तब्बल दोन लाख २३ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल काढून घेत ट्रकचालकास जत्रा हॉटेल चौफुलीजवळ सोडले. चालक चव्हाण यांनी भद्रकाली पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.

सराईताचेच कृत्य

याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे म्हणाले की, आरोपींनी कांदा लुटण्यासाठीच हा बनाव केल्याचे स्पष्ट होते. स्कॉर्पिओ क्रमाकावरून मालकाचा शोध घेण्यात आला. त्याने आपले वाहन दुसऱ्या व्यक्तीकडे दिल्याचे सांगितले. त्यानुसार तपास पथकाने संजय काजळे (३५) या संशयिताचा माग काढत त्याला ताब्यात घेतले.काजळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरूद्ध आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर शहरातच राहणाऱ्या त्याच्या अन्य तीन साथीदारांनाही पकडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *