दोन गटातील वादातून दगडफेक; हिंगोलीत तणाव

हिंगोली-औंढा मार्गावर दोन गटात झालेल्या वादातून हिंगोली शहरात आज अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली. यात तीन जण जखमी झाल्याचं समजतं. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

 सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. दोन गटांतील वादानंतर शहरातील नांदेड नाका परिसरात ट्रॅव्हल्स, कार, टेम्पो व दुचाकीवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले. तर तीन नागरिक जखमी झाले. घटना घडताच पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस उपाधीक्षक सुधाकर रेड्डी, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बंदोबस्तात वाढ करण्यात आली.

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेतला. शहरांमध्ये स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर मुख्य बाजारपेठेसह शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *