पुणे-सातारा महामार्ग बंद झाल्याची अफवा

नीरा नदीवरील सारोळा (ता. भोर) येथील पुणे-सातारा महामार्गवरील पुलावर पाणी आल्याने महामार्गवरील वाहतूक बंद केल्याची अफवा पसरली आहे. प्रत्यक्षात नीरा नदीवरील पुलावर पाणी आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.

पुणे-सातारा महामार्गवरील वाहतूक चालू असून, महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. या महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलामुळे साईड पट्टीवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. परिणामी, वाहतूक संथ गतीने सुरू आहे. सारोळा, नसरापूर, वर्वे येथे वाहतूक कोंडी

आहे. मात्र, महामार्ग पूर परिस्थितीमुळे बंद करण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहन चालकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन प्रशासनने केले आहे.

नदीकाठच्या गावांना अ‍ॅलर्ट

नीरा नदी काठावर अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. निरा देवघर, भाटघर, गुंजवणी या तिन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. वीर धरणातून १ लाख ८० हजार प्रतिसेंकद क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे. नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर सुरूच असल्याने धोम, कण्हेर, बलकवडी, कोयना, उरमोडी, वीर आदी धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून, नद्या धोक्याच्या पातळीवर आहेत. ठिकठिकाणी वाहतूक कोलमडून पडली असून, नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने अ‍ॅलर्ट दिला आहे.

वाईत वाहतूक बंद

वाई येथील कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून वाहतूक सकाळी अकरा वाजल्यापासून बंद करण्यात आली. वाईच्या महागणपतीच्या सोंडेला पाण्याने स्पर्श केला आहे. महागणपती मंदिर परिसरातील दुकान गाळ्यामध्ये पुराचे पाणी घुसल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले. खंडाळा तालुक्यातील केसुर्डी-नायगाव व लोहोम-कण्हेरी पूल पाण्याखाली गेले आहेत. वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असल्याने खुंटे, कांबळेश्वर येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. फलटणहून बारामतीकडे जाणारी वाहतूक सोमवार पेठ येथे बॅरिकेड लावून बंद करण्यात आली आहे.

प्रमुख धरणातील पाणीसाठा

धोम : १०.२७ (८७.८४) विसर्ग : १९८७४

धोम-बलकवडी : ३.४४ (८६.८९) विसर्ग : ४३८५

कण्हेर : ८.४३ (८७.९२) विसर्ग : १३५१८

उरमोडी : ८.८८ (९२.०१) विसर्ग : ९३९८

तारळी : ५.१७ (८८.४१) विसर्ग : ८९५३

नीरा : ११.५३ (९८.२८)

भाटघर : २२.९० (९७.४४)

वीर : ८.९७ (९५.३६) विसर्ग : १ लाख ८० हजार

………

उंब्रजमधून ५६

पूरग्रस्तांना हलवले

सातारा :

कराड तालुक्यातील उंब्रज येथील ५६ पूरग्रस्तांना सुरक्षेतेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेत तात्पुरती निवाऱ्यांची सोय केली आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी उंब्रज येथील ५६ पूरग्रस्तांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी नागठाणे जवळील उरमोडी नदीवरील पुलाची व उंब्रज येथील तारळी नदीवरील पुलांचीही पहाणी केली.

अडीच हजार लोकांना हलिवले

सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापनासाठी अहोरात्र काम करीत आहे. जिल्ह्यातील ५९८ कुटुंबांतील २५६८ बाधित नागरिक आहेत. या नागरिकांची जिल्हा परिषद शाळा, नगर परिषद शाळा, अंगणवाड्या, समाज मंदिरामध्ये, मंदिरांमध्ये, तात्पुरते शेड उभे करून त्यांची तात्पुत्या निवाऱ्याबरोबर त्यांच्या अन्न पाण्याचीही सोय जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

परळी खोऱ्यात पावसाचा हाहाकार

परळी, ठोसेघर, चाळकेवाडी, पाटेघर, रोहोट परिसरात पावसाचा हाहाकार सुरू आहे. या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक गावांत ओढ्य़ा नाल्याचे पाणी गेल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. उरमोडीच्या सांडव्यातून चारही दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु केल्याने नदीने पुररेषा ओलांडली आहे. उरमोडी धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्याने परळी गावानजीक नुकताच बांधलेला उरमोडी पूल पाण्याखाली गेला आहे. परळी येथील पांडवकालीन महादेव मंदिरात पाणी शिरले आहे. स्मशानभूमीही पाण्यात बुडाली आहे. नदीकाठच्या शेतात पाणी घुसल्याने फार मोठे शेतीचे नुकसान झाले आहे. पांगारे धरणाच्या पलिकडील गावांचा संपर्क तुटला आहे. बोंडारवाडी, सांडवली, मोरबाग, वारस ही गावांचा संपर्क तुटला आहे. धोम व कण्हेर धरणातून पाणी सोडल्यामुळे व सतत पडणाऱ्या पावसामुळे सातारा-रहिमतपूर रस्त्यावरील धामणेरच्या कृष्णा नदीतील पुराचे पाणी पुलाला लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *