पूरामुळे बसमध्येच काढली आख्खी रात्र

गोव्याला जाण्यासाठी सोमवारी रात्री अकरा वाजता पुण्यातून २७ प्रवाशांना घेवून खासगी आरामबस निघाली. मध्यरात्री राधानगरीपर्यंतचा पल्लाही गाठला होता. पण पाण्याने रस्ता अडवल्याने तिथेच अडकण्यापेक्षा परत पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. परत येत असताना तावडे हॉटेलजवळही पुराने वाहतूक बंद झाली. पहाटे तीनपासून मंगळवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्व प्रवाशी बसमध्ये बसून होते. काहींनी विमानाने हैदराबादहून पुणे गाठायचे ठरवले, पण विमानसेवाही बंद झाली. त्यामुळे घरी परतण्यासाठी प्रतीक्षेशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही.

पुण्यातून निघालेली बस राधानगरीजवळ जाऊन अडकली. तिथे आणखीही आराम बस उभ्या होत्या. बहुतांश बस तिथेच थांबल्या, पण या बसच्या चालकाने परत पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रात्री तीनच्या सुमारास ते कोल्हापुरात आले. हायवेला जाण्यासाठी सुरू असलेले रस्ते शोधण्यासाठी बसचा बराच वेळ गेला. त्यानंतर उचगावमार्गे बस तावडे हॉटेल चौकानजीक आली. पंचगंगेच्या पुलावर आलेल्या पाण्यामुळे पोलिसांनी तावडे हॉटेलच्या उचगावकडून येणाऱ्या सेवामार्गाच्या अलिकडेच रस्ता बंद केला. रात्रीपासून ते पाणी कमी होईल याची वाट पहात होते. दिवस उजाडून मध्यावर आला तरी पाणी ओसरण्याचे नाव घेईना. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या प्रवाशांनी पोलिसांशी, स्थानिक नागरिकांशी चर्चा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी हा पूर लगेच ओसरणार नाही, असे समजताच त्यांची पाचावर धारण बसली. अनेकांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली. काहीजणांना विमानसेवेचा पर्याय निवडला. तिथून ते उजळाईवाडी विमानतळावर गेले. पण खराब हवामानामुळे विमाने आली नसल्याने तो पर्यायही संपला.

दोन कुटुंबे तान्हुल्यांसह प्रवास करत असल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली होती. शेजारील काही नागरिकांनी त्यांच्या चहा, नाष्ट्याची सोय केली. शेजारील हॉटेलमध्ये जेवणाची सोय होती. पण कितीवेळ रस्त्यात बसून रहायचे हा प्रश्न साऱ्याच प्रवाशांना सतावत होता. अनेकांसमोर पुण्याला जाण्यासाठी पाणी कमी होण्याशिवाय दुसरा मार्ग नसल्याने सुरक्षित ठिकाणी थांबायचे इतकेच हातात होते. त्यासाठी काहींनी वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क साधण्यास सुरुवात केली. रात्रीपर्यंत ते उचगावसमोरील रस्त्यावरच थांबून होते. काहींनी कोल्हापुरातील मित्र व नातेवाईक शोधले. पण पंधरा प्रवाशी रात्री सर्वजण बसमध्येच बसून होते.

कोट

‘पर्याय नसल्याने सर्व प्रवाशी रात्रीपासून बसमध्ये अडकलो आहोत. स्थानिक नागरिकांनी मदत केली. पण पुण्याला जाण्यासाठी रस्त्यावरील पाणी कमी होण्याशिवाय पर्याय नाही. बसमध्ये दोन लहान मुले व कुटुंबही आहेत. त्यामुळे कुठे तरी सुरक्षित आसरा शोधत आहोत.

निलेश कोठावडे, प्रवाशी, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *