सातवीतील मुलाची ‘अपहरण कथा’

सातवीत शिकणाऱ्या प्रणयला (बदललेले नाव) गरजेनुसार सर्व काही मिळत होते, मात्र पालकांचे लक्ष नाही, अशी भावना त्याच्या मनात घर करून होती. पालकांनी आपल्याला वेळ द्यावा, लक्ष द्यावे, असे त्याला वाटायचे. त्यातच शाळेतील परीक्षेत कमी गुण मिळाले. त्यामुळे प्रणयने पालकांची सहानुभूती मिळविण्यासाठी चक्क स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. त्याच्या या कारनाम्यामुळे पोलिस यंत्रणा मात्र तब्बल १६ तास दावणीला बांधली गेली, पण अखेरीस सीसीटीव्ही फूटेजवरून प्रणयचा प्रताप उघडकीस आला.

घाटकोपर येथील गुन्हे शाखा युनिट ७च्या कार्यालयात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास १३ वर्षांचा प्रणय गेला. घाबरलेल्या अवस्थेतील प्रणयला पाहून पोलिसांनी त्याला धीर दिला. ‘दोन गुंडांनी माझे अपहरण केले. मरोळ येथून रिक्षातून नेत असताना सिग्नलला रिक्षा थांबली आणि मी पळ काढला व पोलिस ठाणे पाहून येथे आलो’, अशी कथा प्रणयने रंगवली. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. प्रणय मरोळ नाका परिसरात राहत असल्याने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती सहार पोलिसांना दिली. सहार पोलिसांनी तीन पथके तयार केली.

पोलिसांचे एक पथक सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी करत होते, दुसरे पालकांची चौकशी करून कुणाशी वैर आहे का, हे तपासात होते, तर तिसरे पथक गुन्हेगारांची माहिती काढत होते. मरोळपासून घाटकोपरपर्यंतचे सीसीटीव्ही तपासण्यात आले. घरातून निघाल्यावर काही अंतर प्रणय एकटाच चालत असल्याचे दिसले. मात्र पुढील बस थांब्यावरून त्याने घाटकोपरला जाण्यासाठी बस पकडल्याचे दिसले. यावरून प्रणय खोटे बोलत असल्याचे उघड झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *