घाटकोपर येथील गुन्हे शाखा युनिट ७च्या कार्यालयात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास १३ वर्षांचा प्रणय गेला. घाबरलेल्या अवस्थेतील प्रणयला पाहून पोलिसांनी त्याला धीर दिला. ‘दोन गुंडांनी माझे अपहरण केले. मरोळ येथून रिक्षातून नेत असताना सिग्नलला रिक्षा थांबली आणि मी पळ काढला व पोलिस ठाणे पाहून येथे आलो’, अशी कथा प्रणयने रंगवली. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. प्रणय मरोळ नाका परिसरात राहत असल्याने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती सहार पोलिसांना दिली. सहार पोलिसांनी तीन पथके तयार केली.
पोलिसांचे एक पथक सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी करत होते, दुसरे पालकांची चौकशी करून कुणाशी वैर आहे का, हे तपासात होते, तर तिसरे पथक गुन्हेगारांची माहिती काढत होते. मरोळपासून घाटकोपरपर्यंतचे सीसीटीव्ही तपासण्यात आले. घरातून निघाल्यावर काही अंतर प्रणय एकटाच चालत असल्याचे दिसले. मात्र पुढील बस थांब्यावरून त्याने घाटकोपरला जाण्यासाठी बस पकडल्याचे दिसले. यावरून प्रणय खोटे बोलत असल्याचे उघड झाले.
