निम्मा देश पावसाच्या प्रतीक्षेत

निम्मा पावसाळा संपत आला तरी देशातील पावसाची स्थिती अजूनही चिंताजनकच आहे. शुक्रवारी देशभरात मान्सून पोहोचल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले, मात्र त्याचवेळी देशभरातील पावसाच्या स्थितीचा विचार करता ४५ टक्के जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे; तर आणखी नऊ टक्के जिल्ह्यांमध्ये याची तीव्रता अधिक आहे. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त देश पाऊस केव्हा समाधानकारक पडणार या प्रतीक्षेत आहे. १ जूनपासून १७ जुलैपर्यंत देशभरात एकूण १६ टक्के पाऊस कमी झाला आहे.

पाऊस उशिरा आला तरी जुलै महिना दिलासा देईल अशी अपेक्षा होती. मात्र सध्याची आकडेवारी चिंता वाढवणारी ठरली आहे. १ जून ते २१ जुलै रोजी सकाळी ८.३० पर्यंतच्या आकडेवारीचा विचार करता एकूण ६८६ जिल्ह्यांपैकी फक्त ६४ जिल्ह्यांत पाऊस सरासरीहून अधिक आहे. तर, २३२ जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठण्याचा प्रयत्न केला आहे. उर्वरित ३६३ जिल्हे पुरेसा पाऊस केव्हा पडणार, असा प्रश्न विचारत आहेत. देशभरातील सहा जिल्ह्यांमध्ये ही नोंद झालेली नाही.

महाराष्ट्रातील १९ जिल्हे सरासरीच्या प्रतीक्षेत

देशातील गुजरात, ओडिशा, छत्तीसगड, उत्तराखंड, मणिपूर, तेलंगण, महाराष्ट्र, झारखंड, तमिळनाडू आणि पाऊस ज्या राज्यातून देशात प्रवेशला त्या केरळमध्येही आत्तापर्यंत अनेक जिल्ह्यांत पावसाने सरासरी गाठलेली नाही. मणिपूरच्या नऊ जिल्ह्यांपैकी आठ जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस, नागालँडच्या ११ जिल्ह्यांपैकी १० जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस अशी धडकी भरवणारी सध्याची परिस्थिती आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस अनुभवलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *