१० हजार सैनिकांना पाठविणार बांबूच्या राख्या

मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या हातून राख्या तयार करण्यात येत आहेत. यंदा जिल्हा सैनिक कार्यालयाच्या माध्यमातून सीमेवरील जवानांना १० हजार राख्या पाठविल्या जातील, अशी माहिती नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील देशपांडे यांनी रविवारी पत्रपरिषदेतून दिली.
यावर्षी स्वातंत्र्यदिनी रक्षाबंधन हा उत्सव येत आहेत. या उत्सवानिमित्त बाजारपेठेत राख्या विक्रीस येतात. मात्र, सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना बांबूपासून निर्मित राख्या पाठविल्या जात आहे. मेळघाटातील धारणीनजीकच्या लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्रात जवानांसाठी खास करुन राख्या तयार करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून आदिवासी पुरूष, महिलांना रोजगाराचे साधन देखील उपलब्ध झाले आहे. रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिन एकाच दिवशी साजरा केला जाणार आहे. परिणामी अंबाकार्ट या आॅनलाईन वेबसाईटच्या व अ‍ॅपच्या माध्यमातून बांबू राखी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही पर्यावरणपूरक बांबू राखी असल्याची बाब संजय गुंबळे यांनी स्पष्ट केली. आदिवासी बांधवांना रोजगार निर्मिती व्हावा, हा यामागील उद्देश असून ३० ते ५० प्रकारच्या डिझाईनमध्ये पर्यावरणपूरक राख्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या राखीला ‘सृष्टीबंध’ असे नाव देण्यात आले आहेत. यंदा सैनिकी कार्यालयाच्या सहकार्याने दहा हजार राख्या सैनिकांना पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सैनिकांच्या भगिनी या राख्या पाठवतील, असे नियोजन जिल्हा सैनिक कार्यालयाने केल्याची माहिती संजय गुंबळे यांनी दिली. रक्षाबंधनाच्या दिवशी सैनिकांना बहिणींची आगळी भेट पर्यावरणपूरक राखीच्या माध्यमातून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *