भारताच्या इतिहासाची जपणूक करण्यात हयात घालवणारे पद्मश्रीसदाशिव गोरक्षकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८६ वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे इतिहासाचा जाणकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
‘राजभवन्स इन महाराष्ट्र’, ‘अॅनिमल्स इन इंडियन आर्ट’, ‘द मॅरिटाइम हेरिटेज ऑफ इंडिया’, ‘कार्ले केव्हस ऑफ वेस्टर्न इंडिया’, ‘कालिदास अँड द महायोगी ऑफ घारापुरी’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. या पुस्तकांच्या शीर्षकातून त्यांच्या लेखनाचे स्वरूप आणि व्याप्ती लक्षात येते. महाराष्ट्राच्या दृष्टीने त्यांच्या हातून घडलेली अजून एक लेखनकृती म्हणजे ‘डॉन ऑफ सिव्हिलायजेशन ऑफ महाराष्ट्र’. यात त्यांनी उत्खननातून हाती आलेल्या तिसऱ्या शतकातील महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक नमुन्यांच्या आधारे इतिहासाच्या प्रदीर्घ कालौघातील महाराष्ट्राचा दीर्घ प्रवास अधोरेखित केला. तसेच त्यांनी पश्चिम भारतातील गुप्ताकालीन शिल्पकलेवरही लेखन केले. त्यांच्या एकंदर कार्यकर्तृत्वाची दखल सरकार दरबारी वेळीच घेतली गेली आणि त्यांना २००३मध्ये ‘पद्मश्री’ हा नागरी सन्मान देउन गौरवण्यात आले होते. २०१६ मध्ये त्यांना ‘चतुरंग’च्या जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
