देशभर पोलीस कर्मचाऱ्यांची ५.४ लाख पदं रिक्त

एकीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच दुसरीकडे देशातील ५.४ लाख पोलीस कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत. रिक्त पदांच्या तुलनेत भर्ती होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्याही खूप कमी आहे.

भारतीय तरुणांसमोर बेरोजगारीचा प्रश्न ‘आ’वासून उभा आहे. नोकऱ्या नाहीत अशी ओरड ऐकू येत असताना ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अॅण्ड डेव्हल्पमेंटच्या जानेवारी २०१८च्या आकडेवारीनुसार देशामध्ये ५.४ लाख पोलीस कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत. नागालँड हे राज्य वगळता इतर सर्व राज्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. नागालँडमध्ये मात्र वाजवीपेक्षा ९४१ पोलीस कर्मचारी जास्त आहेत.
पोलिसांचा सर्वाधिक तुटवडा उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेशात एकूण ४,१४, ४९२ पोलीस कर्मचाऱ्यांची गरज असून आता फक्त २,८५, ५४० पोलीस कर्मचारीच कार्यरत आहेत . एकूण १.२९ लाख कर्मचाऱ्यांचा उत्तर प्रदेशमध्ये तुटवडा आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक बिहारचा लागतो. बिहारमध्ये १,२८,२८६ कर्मचाऱ्यांची गरज असून आता फक्त ७७,९९५ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ४८, ९८१ ,तेलंगणात ३०,२४५ तर महाराष्ट्रात २६, १९६ पोलीस कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत. राजधानी दिल्लीतही ११,८१९ पोलीस कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत.

देशामध्ये २०१८ रोजी २४,८४,१७० पोलीस कर्मचाऱ्यांची गरज होती पण वास्तवात मात्र १९,४१,४७३ पोलीस कर्मचारीच होते. ओडिशा, जम्मू-काश्मीर, छत्तीसगडसारख्या संवेदनशील राज्यांमध्येही हजारो पोलीस कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *