उत्तर प्रदेशात धुळीच्या वादळाचे २६ बळी

उत्तर प्रदेशातील विविध भागांत विजांच्या लखलखाटासह झालेल्या धुळीच्या वादळामुळे शुक्रवारी २६ जणांचा मृत्यू झाला असून, ५७ जण जखमी झाले आहेत. या वादळात अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून अनेक घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. वादळामुळे झाडेही उन्मळून पडली आहेत. मणीपुरी जिल्ह्यात गुरुवार सायंकाळापासून वादळी वाऱ्यास सुरुवात झाली होती. त्यात सहा जणांचा मृत्यू ओढवला. इटाह आणि कासगंज येथे प्रत्येकी तिघांचा मृत्यू झाला; तसेच मुरादाबाद, बडाउन, पिलभीत, मथुरा, कनौज, संबळ आणि गाझीयाबाद या भागांतही काही जणांचे मृत्यू ओढवल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

धुळीच्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले; तर काही ठिकाणी इमारतींच्या भिंती ढासळल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मणिपुरी जिल्ह्यात सर्वाधिक ४१ जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तातडीने या भागात मदतकार्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत; तसेच मदत कार्यावर देखरेख ठेवण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य माहिती सचिव अविनाश अवस्थी यांनी दिली. वादळातील जखमींना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत उत्तर प्रदेश सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. या वादळात साठ जनावरेही दगावली असल्याची माहिती अवस्थी यांनी या वेळी दिली.

दरम्यान, वादळामुळे लखनौसह राज्यातील काही भागांत वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *