मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रेल्वे प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, कामायनी एक्स्प्रेस मुंबईहून वाराणसीकडे निघाली होती. मुसळधार पाऊस असल्याने माचक नदीवरचा पूल व त्यावरील रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. हे रूळ ओलांडतानाच कामायनी एक्स्प्रेसचे डबे घसरले. त्यानंतर काही वेळानंतर जबलपूरहून मुंबईकडे येणाऱ्या जनता एक्स्प्रेसचे इंजिन आणि काही डबेही त्याच ठिकाणी रुळांवरून घसरले. कामायनी एक्स्प्रेसचे १० तर जनता एक्स्प्रेसचे ५ डबे नदीत कोसळल्याची माहिती आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या विशेष गाड्या मदत व बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत ३०० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सर्व आपत्कालीन यंत्रणांना घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले असून अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.. प्रवाशांना तातडीनं मदत देण्याचे सर्व प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले आहे. तसेच रेल्वे अपघाताविषयी सविस्तर माहिती संसदेत देऊ असे प्रभू म्हणाले.
मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख, गंभीर जखमी झालेल्यांना ५० हजार तर किरकोळ जखमींना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची घोषणा रेल्वेकडून करण्यात आली आहे.

