जम्मू जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग करत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला.
पाकिस्तानी रेंजर्सनी रात्री १०.४० च्या सुमारास आर.एस.पूरा सेक्टरमध्ये भारतीय चौक्यांवर गोळीबार करताना उखळी तोफांचाही मारा केला अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिका-याने दिली.
सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफने या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले नाही. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्य या गोळीबारात आणि उखळी तोफांच्या मा-यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही असे अधिक-याने सांगितले.
आंतरराष्ट्रीय सीमेवर बारा तासांच्या आत पाकिस्तानकडून झालेली शस्त्रसंधी उल्लंघनाची ही दुसरी घटना आहे. शनिवारीही पाकिस्तानी रेंजर्सनी आंतरराष्टीय सीमेवरील जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये २३ भारतीय चौक्यांवर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला होता.
सीमा सुरक्षा दलाने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. २९ आणि ३० जुलैला पाकिस्तानी रेंजर्सनी चारवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. जुलै महिन्यात पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात आतापर्यंत तीन जवान शहीद झाले आहेत.
