लोकसभा निवडणुकीत दिल्ली राखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनेही कंबर कसली आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा दिल्यास दिल्लीतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये ८५ टक्के आरक्षण देण्यात येईल. तसेच भूमिपुत्रांनाही सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण देण्यात येईल, अशी घोषणाच अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
२४ तासांत परमनन्ट करणार
कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी आम्ही दहा वेळा कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर केला. त्याची फाइल केंद्र सरकारला पाठवली. पण त्यावर अजूनही निर्णय झाला नाही. केवळ दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसल्याने असे होत आहे. दिल्लीला पूर्ण राज्य केल्यास अवघ्या २४ तासांमध्येच कंत्राटी कामगारांना कायम केलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच दिल्लीतील नागरिकांना सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
