काँग्रेसच्या ७व्या यादीत राज्यातील ५ नावे

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी ३५ उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली असून यात महाराष्ट्रातील ५ नावांचा समावेश आहे. यात भिवंडीहून सुरेश टावरे, चंद्रपूरहून विनायक बांगडे, जालन्यातून विलास औताडे, औरंगाबादमधून सुभाष झांबड आणि लातूरहून मच्छिलिंद्र कामंत यांचा समावेश आहे.

चंद्रपूरमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल मुत्तेमवार यांना उमेदवारी मिळणार असे सांगितले जात होते. तसेच, इथून नरेश पुगलिया नरेश पुगलिया, बाळू धानोरकर यांच्याही नावांची चर्चा होती. आता चंद्रपूरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर आणि काँग्रेसचे विनायक बांगडे यांच्यात लढत होणार आहे.

औरगाबादचे शिवसेनेचे तगडे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याशी काँग्रेसच्या सुभाष झांबड यांचा मुकाबला होणार आहे. झांबड हे औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. झांबड हे औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल सत्तार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत.

जालन्यात पुन्हा दानवे विरुद्ध औताडे

जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्याशी काँग्रेसचे विलास औताडे अशी यंदा पुन्हा लढत होणार आहे. १९९९मध्ये दानवे यांनी या मतदारसंघाच विजय मिळवल्यानंतर तेव्हापासून काँग्रेसला ही जागा मिळवता आलेली नाही. दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने दानवे आणि भाजपसाठी ही लढाई प्रतिष्ठेची समजली जाते.

लातूरमध्ये काँग्रेसच्या मच्छिलिंद कामंत यांची भाजपचे सुधाकर श्रृंगारे यांच्याशी लढत होणार आहे. इथे भाजपने विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांना डच्चू देत शृंगारेना तिकीट दिले आहे. इथे भाजपचा नवा उमेदवार आहे, शिवाय जिल्हा परिषदचे सदस्य असलेले श्रृंगारे यांचा लातूरमधील जनसंपर्क चांगला आहे. याचा त्यांना फायदा होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भिवंडीच्या जागेसाठी सुरेश उर्फ बाळ्या मामा पाटील आणि सुरेश टावरे यांच्यात तिकिटासाठी चुरस होती. मात्र यात सुरेश टावरेंचा विजय झाला. गेल्या लोकसभा निवडणुकीसाठी इथून कविश्वनाथ पाटील यांना उमेदवारी दिली होती. पाटील यांचा भाजपच्या कपिल पाटील यांनी १ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *