पावसाने दडी मारल्यानंतर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देण्यासाठी सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरु केला आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील सायगावमध्ये पहिल्यांदाच कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यात येत आहे.
सायगावात आज सकाळी 7 वाजून 1 मिनिटांनी दोन रॉकेटच्या साहाय्याने ढगांवर मारा करण्यात आला. यानंतर 45 मिनिटांत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याचबरोबर आणखी सहा रॉकेट्सचा ढगांवर मारा केला जाणार आहे.
तर औरंगाबादमध्येही आज कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग होण्याची शक्यता आहे.
कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी आयएसपीएस या संस्थेने स्वतःहून पुढाकार घेतला आहे. रॉकेटद्वारे आकाशातील ढगांवर मारा करुन कृत्रिम पाऊस पाडला जाणार असल्याने, त्यासाठी ओझर येथून हिंदुस्तान एरोनॉटिक कंपनीतून परवानगी घेण्यात आली.
आयएसपीएस ही एक खाजगी संशोधन करणारी संस्था असून या संस्थेद्वारे यापूर्वी रॉकेटच्या साहाय्याने सिंधुदुर्ग, सांगली या ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोग करण्यात आले आहेत.
या सर्व प्रयोगाचा खर्च आणि रॉकेटसाठी लागणारा खर्च ही संस्था स्वतःच करत असते आणि शासनाकडून त्यांना केवळ परवानगी आणि मदत दिली जाते.

