दोन आठवड्यांपूर्वी दरड कोसळल्यानंतर दुरुस्ती करण्यात आलेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा दरड कोसळली आहे. खंडाळा घाटाजवळ दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने शनिवारपासून या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला होता. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून या मार्गावर होत असलेली वाहतूक कोंडी नाहीशी होऊन मनस्तापातून सुटका होण्याची आशा प्रवाशांना होती. मात्र वाहतूक पूर्ववत केल्याच्या अवघ्या काही तासांत पुन्हा दरडकोंडी होण्याची नामुष्की ओढवली आहे.
एक्स्प्रेस-वेवरील आडोशी बोगद्याजवळ 19 जुलै दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला; तर पाच जण जखमी झाले होते. त्यापूर्वी 22 जून रोजी दरड कोसळण्याची घटना घडली होती. या घटनेनंतर एक्स्प्रेस वेवरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला.
परिणामी, रस्ते विकास महामंडळाने पाहणी करून एक्स्प्रेस वेच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यासाठी 22 जुलैपासून या मार्गावरील वाहतुकीत दुपारच्या वेळेत बदल करण्यात आला होता. ते दुरुस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, काही ठिकाणी किरकोळ दुरूस्ती करणे शिल्लक आहे.
त्यामुळे शुक्रवारी या दुरूस्ती मोहिमेची सांगता करण्यात आली. शिल्लक काम वाहतूक न थांबविता कमी गर्दीच्या वेळेस केले जाईल, असे रस्ते विकास महामंडळाचे पुण्याचे अधीक्षक प्रशांत औटी यांनी सांगितले.
दुरुस्तीचे काम सुरुवात केल्यानंतर काही वेळातच वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळे दुरूस्ती सत्रादरम्यान वाहतूक कोंडीचा काही प्रमाणात ताण येत होता, असेही औटी यांनी सांगितले.
दरम्यान, या 10 दिवसात दुपारी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे एसटीच्या बसेस उशिराने धावत होत्या. प्रवाशांना काही तास बसमध्ये अडकून बसावे लागत होते. त्याचा परिणाम प्रवासी संख्येवरही झाला. रस्ते वाहतुकीऐवजी रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य दिले होते.

