नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यास मदत करु शकतील अशी महत्त्वाची कागदपत्रे उंदराने कुरतडल्यामुळे अथवा वाळवी लागल्यामुळे नष्ट झाली आहेत किंवा हलगर्जीपणामुळे हरवली आहेत, असे देशाचे माहिती आयुक्त वजाहत हबीबुल्ला यांनी सांगितले. ते दिल्लीत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
माहिती आयुक्त श्रीधर अचार्युलू यांनी आपल्या कार्यकाळातील पहिल्या वर्षाच्या अनुभवावर लिहिलेल्या ‘आरटीआय युज अँड अॅब्युज’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना वजाहत हबीबुल्ला यांनी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील कागदपत्रे गायब असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मन दौ-यावर असताना नेताजींच्या नातलगांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान नेताजींशी संबंधित कागदपत्रे जाहीर करावी, अशी मागणी नेताजींच्या नातलगांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन पंतप्रधानांनी मायदेशी परतल्यावर कागदपत्रांबाबत अधिका-यांकडे सविस्तर माहिती मागितली आणि त्याचवेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील कागदपत्रे गायब असल्याचे लक्षात आल्याचे हबीबुल्ला म्हणाले. ऐतिहासिक महत्त्व असलेली कागदपत्रे सांभाळण्याच्या बाबतीत सरकारी यंत्रणेत अनेक ठिकाणी आजही बेफिकीरपणा दिसून येत असल्याबाबत हबीबुल्ला यांनी नाराजी व्यक्त केली.

