सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून तिघा तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जयपूरमध्ये घडली. दुष्यंत पारिक, विशाल पारिक व पंकज सिंह अशी या मृत्यू झालेल्या तिघा तरुणांची नावे असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.
जयपूरमध्ये राहणारा दुष्यंत पारिक व त्याचे चार मित्र पावसाळ्यात भटकंतीसठी सेज येथील नदीकिनारी गेले होते. पाण्यात भिजत असताना सेल्फी काढण्याचा मोह या तरुणांना आवरता आला नाही. पाण्याच्या प्रवाहात उभे राहून सेल्फी काढत असताना पंकजचा पाय घसरला व तो पाण्याच्या प्रवाहात वाहू लागला. दुष्यंत व विशाल हे दोघेही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पाण्याच्या प्रवाहाला जोर असल्याने हे तिघे बुडाले. बचावलेल्या दोघा तरुणांनी या घटनेची माहिती स्थानिकांना दिली. यानंतर स्थानिक पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी या तिघा तरुणांचे मृतदेह बाहेर काढले.

