आशिया खंडातील सर्वात मोठा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार यंदा एम्सचे माजी दक्षता अधिकारी संजीव चतुर्वेदी आणि गुंज या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अंशु गुप्ता या दोन भारतीयांना जाहीर झाला आहे.
२००२ च्या बॅचमधील वन सेवेतील अधिकारी संजीव चतुर्वेदी यांनी एम्सच्या दक्षता अधिकारीपदावर असताना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढली होती.
भ्रष्टाचारा विरोधातील धडक कारवाईमुळे केंद्र सरकारने त्यांना पदावरुन बाजूला केले होते. यावरुन त्यांचा केंद्र सरकारशी वाद सुरु आहे. सध्या ते एम्समध्ये उपसचिव आहेत.
भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढताना चतुर्वेदी यांनी कुठलीही तडजोड न करता जी हिम्मत दाखवली. आपल्या कामातून त्यांनी आदर्श निर्माण केला. व्यवस्थेमध्ये सुधारणा होऊन लोकांना पारदर्शक, चांगली सेवा मिळावी हा
त्यांचा जो हेतू आहे. त्यासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येत असल्याचे पुरस्कार समितीने म्हटले आहे. संजीव चतुर्वेदी यांना रॅमन मॅगसेसे सारखा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर होणे ही केंद्र सरकारसाठी एक चपराक आहे.
अंशु गुप्ता यांनी गुंज या आपल्या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्यासाठी त्यांची या पुरस्कारसाठी निवड करण्यात आली. बुधवारी सकाळी रॅमन मॅगसेसे समितीकडून पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. एकूण पाच जणांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.

