शंभर जणी झाल्या जटमुक्त

कचरा, धूळ, जंतुसंसर्ग यामुळे केसांमधील गुंता वाढत जातो त्यातून जट निर्माण होते, मात्र हे देवाच्या घरचे देणे आहे या अंधश्रद्धेमध्ये आजही मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या असंख्य महिला या जटेचे ओझं वागवत जगत आहे. वर्षभरात राज्यातील शंभर मुली-महिलांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या अभियानाच्या माध्यमातून जटमुक्त करण्यात आले आहे.

जट झाली की ती लपवून ठेवण्याकडे अनेक महिलांचा कल असतो. त्यामुळे केसांमधला हा गुंता वाढत जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धांमुळे ही जट काढली जात नाही. त्यात उवा, लिखा होतात. डोक्याला जखमा होतात. महिलांना संसर्ग होऊन त्यामुळे ताप येणे, डोके दुखणे असे प्रकारही होतात. मुळात जट का होते, याची व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याने या जटा वाढत जातात, असे ‘अंनिस’च्या नंदिनी जाधव सांगतात. ‘अंनिस’ने जटा का होतात, त्या कशा काढायच्या, त्या काढल्यानंतर कोणत्याही प्रकारचा अपाय होत नाही, याचे जेव्हा प्रबोधन करायला सुरुवात केली तेव्हा विरोधही तगडा होता. अनेकींना जट काढली की पाप लागेल, घरावर संकट येईल अशी भीती वाटत होती, त्यामुळे त्या जट काढून टाकायला तयार नव्हत्या. मात्र समुपदेशन, प्रत्यक्ष जट सोडवण्यासाठी वेळ पडल्यास कापण्यासाठी मदत केल्यानंतर या महिलांना मोकळे वाटते. पुणे, कोल्हापूर, सातारा, कर्नाटक अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या महिलांना जटमुक्त करण्यात यश मिळाले आहे. ही मुक्ती केवळ जटांमधून नसते तर त्याच्याशी निगडित असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींमधून महिला मुक्त झाल्याचा अनुभव नंदिनी सांगतात.

टक्कल करण्याची गरज नाही.

जट अधिक घट्ट रुतलेली असेल तर ती काढताना टक्कल करावे लागेल अशी एक भीती महिलांच्या मनात असते. विद्रुप दिसल्यानंतर कुटुंब, नातलग स्वीकारणार नाही या भीतीपोटी त्या जट काढायला तयार नसतात. मात्र ब्युटिशिअनचे प्रगत शास्त्रोक्त शिक्षण घेतलेल्या नंदिनी जाधव या जट कापून काढून केस स्वच्छ करतात, या महिलांना, मुलींच्या चेहऱ्याला साजेल असा लुक देतात त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होत नाही. उलट नव्या रूपामध्ये पाहताना त्यांना स्वतःला अधिक आनंद मिळतो.

मुंबईमध्येही विचारणा

मुंबईमध्ये अशा ११ महिलांनी स्वतः वा त्यांच्या दूरच्या नातलगांनी जट काढण्यासाठी अंनिसकडे विचारणा केली आहे. यातल्या काही जणी उच्चशिक्षित असून त्या विविध क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. मात्र अनेक वर्षांपासून मनामध्ये असलेले जटेचे दडपण त्या दूर करू शकलेल्या नाहीत. या महिलांचे समुपदेशन करून त्यांना जटमुक्त करण्याचा प्रवास निश्चितच सोपा नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *