दप्तर झाले हलके

दप्तर झाले हलके

वजनदार दप्तराच्या ओझ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा भार कमी करण्यासाठी सरकारने अखेर पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक वजनाच्या दहा टक्क्यांहून दप्तराचे वजन अधिक नको, असे सूत्र निश्चित करणारा निर्णय सरकारने घेतला आहे. पहिलीतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे दोन किलो, तर आठवीतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे ४.२ किलोपेक्षा जास्त असू नये, असे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. हा निर्णय राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांना लागू करण्यात आला आहे.

पालकांनीही घ्यावी काळजी

 मुलांच्या शाळेशी निगडीत साहित्य घरात एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी कपाट, रॅक, पेटी किंवा बॅग ठेवावी, मुलांच्या दप्तरांत त्या-त्या दिवशी लागणारे तेवढेच साहित्य भरावे. यासाठी आदल्या रात्री पालकांनी शाळेचे वेळापत्रक पाहावे, अशी सूचना सरकारने केली आहे.

‘दप्तरालय’ सुरू करा

शाळेत ई-लर्निंगचा वापर वाढवण्यात यावा, सर्व मंडळाकडून ई-पुस्तके उपलब्ध राहतील यासाठी काळजी घ्यावी. कार्यानुभव, चित्रकला, कॅम्प्युटर, शारीरिक शिक्षण, बालवीर आदी विषयांच्या वह्या शाळेतच ठेवाव्यात. शाळांमध्ये ‘दप्तरालय’ सुरू करावेत, असेही सरकारने म्हटले आहे.

कारवाईबाबत अस्पष्टता

शालेय शिक्षण विभागाने बुधवारी दप्तरांचे ओझे कमी करण्यासंदर्भात राज्य मंडळांसह सर्व केंद्रीय मंडळांनाही तशा प्रकारचे आदेश दिले आहेत. मात्र, हे आदेश न पाळण्याऱ्या शाळांवर कोणत्या प्रकारची कारवाई होणार याबाबत निर्णयात स्पष्टता नाही.

दप्तराच्या ओझ्यासाठी नेमलेल्या समितीने विविध बैठका घेऊन तसेच शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आदींशी चर्चा करून दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत आपल्या उपाययोजना नमूद केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक वाढीबरोबर निकोप व सुदृढ शारीरिक वाढ होणे महत्त्वाचे असल्याने ओझे कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. – विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री
वजन तपासण्याच्या सूचना

दप्तराचे ओझे कमी करण्याच्यादृष्टीने वजन मोजण्याच्या पद्धतीचा विचार करण्यात आला आहे. पहिलीतील मुलांचे सर्वसाधारण वजन हे २० किलो आणि आठवीतील मुलांचे ४२ किलोच्या दरम्यान असते. यामुळे पालकांनी आणि शाळेतील मुख्याध्यापकांनी आपल्या मुलांच्या दप्तराचे मुलाच्या वजनाच्या १० टक्के पेक्षा कमी असेल, याची काळजी घ्यायची आहे. आपल्या मुलांचे वजन माहित करून घ्यावे, यासाठी वह्या पुस्तकांचे वजन करून ते तपासून घ्यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

शालेय विद्यार्थ्यांचे दप्तरांचे ओझे कमी करावे, यासाठी शिक्षण विभागातर्फे प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक महावीर माने यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधिमंडळात सादर केला. या अहवालात करण्यात आलेल्या शिफारशींनुसार सरकारी निर्णय लगोलग जाहीर केला. त्यात पालकांनी आणि शाळांनी दप्तरांच्या ओझे कमी करण्याबाबत घ्यायची काळजी आणि सूचना स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

वजन कमी करण्यासाठी वह्यांची जाडी कमी करावी व त्यानंतरही १० टक्के वजन कमी न झाल्यास मुख्याध्यापकांसोबत चर्चा करून वेळापत्रकात बदल करावा, असेही निर्देशही या आदेशात आहेत. तसेच, पालकांनीही बॅग कमी वजनाची घ्यावी, शाळांनी गृहपाठाचे नियोजन करावे, गृहपाठ तपासण्यासाठी विषयनिहाय दिवस ठरवावा. मात्र पहिली व दुसरीसाठी गृहपाठाच्या वह्यांची आवश्यता नाही, तसेच शाळेत स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, यामुळे मुलांना घरून पाणी आणण्याची गरज भासणार नाही, अशा अनेक गोष्टींचा या निर्णयात समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *