नवविवाहितेला विष पाजून मारल्याचा आरोप करत सासरच्यांना मारहाण

नवविवाहितेला विष पाजून मारण्यात आल्याचा आरोप करत जावई आणि सासऱ्याला मारहाण झाल्याची घटना जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलीय.

तीन महिन्यांपूर्वी धरणगाव तालुक्यातील सोनवद इथल्या ज्योती पाटीलचं लग्न चिखोळ इथल्या गणेश पाटीलशी झालं होतं. लग्नानंतर ३ महिन्यातच सासरच्या मंडळींकडून ट्रॅक्टरसाठी माहेरुन पैसे आणण्यासाठी ज्योतीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरु होता. वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून या ज्योतीनं विष प्राशन केलं. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ज्योतीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा तिच्या माहेरच्या मंडळींनी केला. सासरच्या मंडळींनीच विष देऊन ज्योतीची हत्या केली, असा आरोप त्यांनी केलाय. ज्योतीचा पती आणि सासरे समोर येताच माहेरच्या मंडळींनी दोघांनाही बेदम मारहाण केलीय.

रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही बाजूंकडील हा वाद मिटवला. पोलिसांनी ज्योतीचा पती आणि सासऱ्याला ताब्यात घेतलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *