बालकाश्रमातून मुलगा बेपत्ता

कोपरखैरणे येथील सेक्टर-११ मध्ये असलेल्या मरमीयर बालकाश्रमातून २४ मे रोजी पळून गेलेल्या तीन मुलांपैकी रोहित यादव हा १२ वर्षीय मुलगा अद्याप न सापडल्याने कोपरखैरणे पोलिसांनी या मुलाचे अपहरण झाल्याबाबत गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेतील बेपत्ता रोहितसोबत पळून गेलेली इतर दोन मुले आश्रमात परतली असून, त्यांनी रोहित हा त्याच्या कुटुंबीयांकडे गेल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहितचा शोध सुरू केला आहे.

कोपरखैरणे सेक्टर-११मध्ये मरमीयर बालआश्रम असून या आश्रमात सहा ते १७ वयोगटातील २० मुले राहत असून, त्यांची देखभाल फादर पेपीन जयराज करत आहेत. २४मे रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या

आश्रमातील तीन मुलांनी पलायन केले. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फादर पेपीन जयराज आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांची शोधाशोध केली. मात्र ते कुठेच सापडले नाहीत. यादरम्यान, आश्रमातून पळून गेलेल्यांपैकी १३ वर्षीय व सहा वर्षीय मुले त्याच रात्री आश्रमात परतली. मात्र रोहित आश्रमात परतला नाही. त्यामुळे आश्रमातील कर्मचाऱ्यांनी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी रोहितच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या घटनेतील पळून गेलेली व आश्रमात परतलेली मुले रोहित सोबत आश्रमातून पळून गेल्यानंतर ते रोहितच्या खांदेश्वर येथील नातेवाईकांच्या घरी गेले. मात्र रोहित तिथेच राहिल्यामुळे आपण आश्रमात परल्याचे या मुलांनी सांगितले आहे. मात्र रोहित सोबत ते कुठे गेले होते, हे त्या मुलांना सांगता येत नसल्याने रोहितचा शोध घ्यायचा कसा असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्यामुळे पोलिसांनी रोहितसाठी खांदेश्वरसह आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही.

येथील आश्रमातून यापूर्वीही काही मुलांनी पलायन केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या आश्रमात मुलांचे पालन-पोषण व्यवस्थितरित्या होत नसल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र जयराज यांनी आश्रमातील सर्व मुलांचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले जाते. त्यांना या आश्रमात कुठल्याच प्रकारचा त्रास नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही सगळे बेपत्ता रोहितचा शोध घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *