लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचं निधन

‘जिवलगा, तुम्ही माझे सावकार, शेत जमीन गहाण ठेवीते, घेते मी रोखा करुनी, तुम्ही माझे सावकार…’ अशा शब्दात फड रंगवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत, पारंपरिक पद्धतीने बैठकीची घरंदाज लावणी गाणाऱ्या एकमेव गायिका, लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई विक्रम जावळे उर्फ यमुनाबाई वाईकर  यांचं आज सकाळी ११ वाजता वृध्दापकाळानं निधन झालं. त्या १०३ वर्षाच्या होत्या. उद्या साताऱ्यात वाई येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने लावणीच्या इतिहासातील लखलखता तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.

यमुनाबाई वाईच्या कोल्हाटी समाजाच्या वस्तीत राहत होत्या. ही वस्ती म्हणजे एक लोककलेचे माहेरच होते. यमुना, तारा, हिरा या तीन बहिणी. आईचे नाव गीताबाई. त्याही गायच्या. वयाच्या दहाव्या वर्षापासून डोंबारी खेळातून पोट भरता भरताच यमुनाबाई वाईकरांनी गाणं गायला सुरुवात केली. त्यांना आईकडूनच गाण्याचा वारसा मिळाला. त्याच त्यांच्या पहिल्या गुरू ठरल्या. त्यानंतर त्या ‘रंगू आणि गंगू’ फडावर दाखल झाल्या. तिथे त्या ठेका आणि नाचणं शिकल्या. नंतर वाईला परत आल्यावर ‘यमुना हिरा तारा संगीत पार्टी’ची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांच्या कलेची दखल घेत भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं. त्यांना टागोर अ‍ॅकॅडमीचा जीवन गौरव, माणिक वर्मा प्रतिष्ठान, संगीत अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारचा लावणीसम्राज्ञी  पुरस्कार, जागतिक मराठी परिषद, पहिला लोकरंगभूमी पुरस्कार, वसुंधरा पंडित पुरस्कार, अहिल्याबाई होळकर पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

एका रसिकासाठी रात्रभर गायल्या

यमुनाबाई वाईकर या अस्सल जातीवंत कलावंत होत्या. लावणी गाताना त्या तल्लीन होऊन गात. त्या समोर किती रसिक बसलेत याचा विचारही करत नसत. एकदा औरंगाबादला संगीतबारी चालू होती. आसपास सगळे फड लागलेले. सगळीकडे खूपच गर्दी होती, पण त्यांच्या फडावर एकच तिकिट विकलं गेलेलं. त्यांनी त्या रसिकाचे पैसे परत करण्यास मॅनेजरला सांगितलं, पण तो रसिक काही ऐकेना, तो म्हणाला मी इतका लांबून आलोय, मी ह्यांची लावणी ऐकल्याबिगर नाही जायचा. त्याचा आग्रह बघून यमुनाबाईंनी कार्यक्रम सादर केला. यमुनाबाई त्या एका रसिकासाठी गायला बसल्या खर्‍या, पण एक-दोन गाणी झाल्याबरोबर चारी बाजूनं गर्दी उसळली. कार्यक्रम तर हाऊसफुल झालाच, मैफिलही रात्रभर रंगली. सकाळी नमस्कार करून यमुनाबाई उठल्या तशा मागे इतर फडावरच्या बाया उभ्या होत्या. त्या चटचट पाया पडायला लागल्या. म्हणाल्या तुमच्या गाण्याची नक्कल करूनच तर आम्ही पोट भरतो.

 अभिनयातही निपूण

अभिनय हा अंगभूत गुण असल्याने लोकनाट्यातून यमुनाबाई नाटकांकडे वळल्या. त्यांनी ‘भावबंधन’, ’मानापमान’ आदी संगीत नाटके सादर केली. त्यांची ‘संशय कल्लोळ’ नाटकातली भूमिका नाट्यवेड्या रसिकांच्या खास पसंतीस उतरली होती. त्यांनी ‘धर्मवीर संभाजी’, ‘मोहित्यांची मंजुळा’ आणि ‘महाराची पोर’ या अन्य नाटकांमध्ये भूमिका केल्या. ’महाराची पोर’ नाटक बघायला साने गुरुजी आले होते. या प्रयोगाचे सर्व उत्पन्न यमुनाबाईंनी गुरुजींच्या समाजकार्याला दिले.

यमुनाबाईंच्या गाजलेल्या लावण्या….

>> नेसली पितांबर जरी गं, जरी गं जरतारी लाल साडी, गं चालताना पदर झाडी

>> जना पहाट झाली, चल उठ उठ आता सजना पहाट झाली

>> अर्धा विडा आपण घ्यावा, अर्धा मला द्यावा

>> सोडा सोडा नाद सवतीचा

>> पंचकल्याणी घोडा अबलख

>> कुठवर पाहू वाट सख्याची

>> ऐका चतुरा जीवलगा, नाही गेले बालपण, आहे माझी ओळख

>> तुम्हीच उतरीला चिरा. कोणा विषयाची तर्‍हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *