लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

सरकारकडून बुलेट ट्रेनची स्वप्ने दाखविली जात असली, तरी प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्यांना दररोज गर्दीच्या लोकलमध्ये लटकत प्रवास करावा लागतो. या गर्दीत अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशीच एक घटना बुधवारी डोंबिवली कोपर रेल्वे स्थानकादरम्यान घडली. सकाळी वेळेवर ऑफिस गाठण्यासाठी डोंबिवलीहून जलद लोकलने निघालेल्या रजनीशचा गर्दीच्या रेट्यामुळे पडून अंत झाला. दरम्यान, आपल्या भावाचा नाहक बळी गेल्यामुळे संतापलेल्या रजनीशचा भाऊ अमरीश याने बुलेट ट्रेनच्या बाता करणाऱ्या सरकारला लोकलच्या गर्दीवर मात करण्यासाठी आणखी किती मृत्यू हवेत, असा संतप्त सवाल केला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर परिसरात रजनीश सिंग हा २५ वर्षीय युवक पत्नी, दोन मुले आणि आई-वडील, भावंडांसह राहत होता. मुंबई येथील एका खासगी कंपनीत नोकरी करणारा रजनीश नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवलीहून जलद लोकलने मुंबईकडे जाण्यास निघाला. मात्र डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान गर्दीमुळे दरवाजात लटकत असलेल्या रजनीशचा तोल गेल्याने तो खाली पडला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. रजनीशच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान रजनीशच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा कल्याण-डोंबिवलीकडून सकाळच्या वेळी गर्दीच्या लोकलचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या गर्दीवर मात करण्यासाठी सकाळच्या सत्रात लोकलची संख्या वाढवण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *