नशेबाजांच्या दगडफेकीने प्रवासी झाले जखमी

मध्य रेल्वेच्या जलदमार्गावर असलेल्या ब्रिटिशकालीन पारसिक बोगद्याजवळ फेकण्यात येणाऱ्या दगड आणि तत्सम वस्तूंमुळे गेल्या महिन्यात लोकलच्या दारात उभ्या असलेल्या तीन महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. या प्रकरणाच्या तपासाअंती या वस्तू नशा केल्यानंतर बेभान झालेले काही तरुण फेकत असल्याचे समोर आहे. त्यापैकी चार तरुणांची ओळख पुढे आली असून अद्याप त्यांना अटक करण्यात यश आले नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
मार्च महिन्यात मध्य रेल्वेच्या जलदमार्गावरील पारसिक बोगद्याजवळच लोकलवर दगड फेकले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या. तसेच या दगडफेकीमुळे तीन महिला जखमी झाल्याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एक गुन्हा हा कल्याण रेल्वे पोलिसांकडून ठाणे लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे या परिसरातल्या झोपडपट्टीतील काही तरुण नशेच्या आहारी गेले असून ते नशेत बेभान झाल्यावर हाताला मिळेल, ती वस्तू फेकतात. त्यांनी फेकलेल्या अशा वस्तूंमुळे तीन महिला प्रवासी जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रेल्वे परिसरातील घटनांची नोंद लोहमार्ग पोलीस ठाण्यात होते. तर, रेल्वेच्या मालमत्तेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाची आहे. त्यामुळे रेल्वे आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी दोन्ही प्रशासनाकडे आहे. त्यांनी या परिसरात आपली गस्त वाढवून हे प्रकार कसे रोखता येईल, यांची चाचपणी करणे गरजेचे आहे. मात्र, यासारख्या घटना घडत असताना लोहमार्गाव्यतिरिक्त रेल्वे सुरक्षा बल कुठेही दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यांचा धाक नसल्याने, कारवाईची भीती नसल्याने असे प्रकार वाढत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.
>टेकडीवर नशेची मैफल
रेल्वेमार्गावरील पारसिक बोगद्याजवळ वाघोबानगर टेकडी आहे. तेथे असलेल्या क चराकुंडी परिसरात नशा करणाºया तरुणांची मैफल बसते. ते कपड्यात सुळो घेऊन ओढतात. नशेच्या आहारी गेलेल्या काही तरुणांपैकी चार जणांची ओळख पुढे आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
>उंच सुरक्षा भिंत बांधण्याची मागणी
रेल्वेलाइनच्या बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊन झोपडपट्ट्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. त्यातच, या परिसरात गर्दुल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच शाळांना सुट्या लागल्याने या परिसरात राहणारी बच्चे कंपनी मोठ्या प्रमाणात रेल्वेलाइनजवळ खेळताना दिसत आहे. यामुळे रेल्वेसह प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उंच सुरक्षा भिंत बांधण्याची मागणी पुढे येत आहे. ती उभारल्यावर रेल्वेलाइनवर कचराही कमी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *