भारतात शिक्षण हा यशाचा सर्वात मोठा मार्ग मानला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत शिक्षणाचा खर्च झपाट्याने वाढत असताना उच्चशिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारीही चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून पदवी किंवा व्यावसायिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षित नोकरी मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे. शिक्षणाचा वाढता खर्च, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि कौशल्यांतील तफावत यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघांवरही आर्थिक व मानसिक ताण वाढत असल्याचे विविध अहवाल आणि तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
स्तके, प्रोजेक्ट, वसतिगृह आणि इतर उपक्रमांवरही मोठा खर्च करावा लागतो. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मुलांच्या शिक्षणाचा खर्च हा घर खरेदी किंवा इतर मोठ्या आर्थिक जबाबदाऱ्यांइतकाच महत्त्वाचा बनला आहे. परिणामी अनेक पालक बचत मोडतात, कर्ज घेतात किंवा इतर गरजा पुढे ढकलून मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देतात.
पदवी मिळते, पण नोकरी मिळेलच याची खात्री नाही
उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असली तरी त्याच प्रमाणात दर्जेदार रोजगार निर्माण होत नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अनेक पदवीधर महिनोनमहिने नोकरीच्या शोधात राहतात. काहींना त्यांच्या शिक्षणाशी संबंध नसलेल्या क्षेत्रात कमी पगारावर काम स्वीकारावे लागते, तर काही जण स्पर्धा परीक्षा किंवा सरकारी नोकरीच्या तयारीत अनेक वर्षे घालवतात. यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही आर्थिक स्वावलंबन लांबणीवर पडत असल्याचे दिसून येते.
बेरोजगारीचे चित्र गुंतागुंतीचे; तरुण सर्वाधिक प्रभावित
अधिकृत आकडेवारीनुसार देशाचा एकूण बेरोजगारी दर तुलनेने नियंत्रित असला तरी तरुणांमधील बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. विशेषतः 18 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवतींना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर योग्य रोजगार मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. रोजगार, शिक्षण किंवा कौशल्य प्रशिक्षण या तिन्हींपासून दूर राहणाऱ्या तरुणांची संख्याही चिंतेचा विषय ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, ही परिस्थिती देशाच्या लोकसंख्यात्मक लाभालाही आव्हान ठरू शकते.
