पुढील बॅचच्या परिचारिकांची सहल रद्द

केईएम रुग्णालयातील परिचारिकांच्या सहल प्रकरणामुळे रुग्णहितास बाधा झाल्याची टीका झाल्यामुळे अखेरीस रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी पुढील बॅचच्या परिचारिकांना सहलीस पाठवणार नाही, असे स्पष्ट केले. सर्वसामान्य रुग्णांच्या भावना लक्षात घेता रुग्णहितास बाधा होऊ नये म्हणून परिचारिकांची नियोजित सहल रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केईएममधील परिचारिका मागील तीन दिवसांपासून पन्नासचे गट करून ठाण्यातील घोडबंदर रोड येथील रिसॉर्टवर सहलीसाठी गेल्यामुळे रुग्णांची गैरसोय झाल्याचा आक्षेप घेण्यात आला. रुग्णालयात परिचारिकांचा तुटवडा असल्यामुळे बदली रजा घेऊन गेलेल्या या परिचारिकांच्या कामाचा भार अन्य कर्मचाऱ्यांवर आल्याची तक्रार होती. पालिका रुग्णालयामधील परिचारिकांना रुग्णसंख्येचा रेटा लक्षात घेऊन या प्रकारे सहलीस जाण्याची मुभा कशी देण्यात आली, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला.

या सहलीमुळे रुग्णहितास बाधा येत असल्याची लेखी तक्रार परळ येथील रहिवासी सुनील शंकर गोगटे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. त्यांनी लिहलेल्या पत्रामध्ये केईएम रुग्णालयात परिचारिकांचा तुटवडा असून, रुग्णसेवा महत्त्वाची न समजता सहलीला जाण्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुपे यांनी समर्थन केल्याचे म्हटले आहे. सहलीपेक्षा रुग्णसेवेला प्राधान्य द्यायला हवे, केईम रुग्णालयात आधीच परिचारिकांचा तुटवडा आहे. रुग्णालयाची रुग्णसेवा महत्त्वाची न समजता सहलीला अधिष्ठाते अधिक महत्त्व देत असल्यामुळे ही लेखी तक्रार केल्याचे सुनील गोगटे यांनी ‘मटा’ला सांगितले. स्वाक्षरी करून या परिचारिका सहलीला गेल्या असतील तर त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे, ही नुकसान भरपाई अधिष्ठाते व मेट्रन यांनी द्यावी, अशी मागणी गोगटे यांनी या पत्रातून केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *