मदरशातील ३० विद्यार्थ्यांना बिर्याणीतून विषबाधा

भिवंडीतील एका मदरशामध्ये बिर्याणी खाल्ल्याने ३० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना बुधवारी घडली. या ३० विद्यार्थ्यांना मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते. मात्र, आम्हाला मुंबईतील नायर रुग्णालयातच उपचार करायचे असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितल्यानंतर त्यांना तिथे दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

भिवंडी येथे दिवान शहा हा मदरशा आहे. या मदरशात १२ ते १५ वयोगटातील ३० मुले शिकत आहे. मदरशात एका व्यक्तीने बिर्याणी वाटप केले होते. मात्र, ही बिर्याणी खाल्ल्यानंतर या ३० विद्यार्थ्यांना उलट्या, पोटदुखी आणि चक्कर येऊ लागली. यानंतर या विद्यार्थ्यांना भिवंडीतील आयजीएम या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, याला काही विद्यार्थ्यांनी विरोध केला. आम्हाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घ्यायचे नाहीत. आम्हाला मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल करा, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. मात्र, या विद्यार्थ्यांनी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यास नकार का दिला, याचे कारण समजू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *